तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या 30 पानटपरीवर कारवाई 7 हजार 600 रुपयाचा दंड वसूल

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या 30 पानटपरीवर कारवाई
7 हजार 600 रुपयाचा दंड वसूल
वर्धा, दि. 14 (जिमाका) : तंबाखू नियंत्रण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या अंतर्गत सामान्य रुग्णालय, अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिस विभागाने आर्वी शहरातील प्रमुख मार्गावरील 30 तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या पानटपरीवर कारवाई केली असून त्यात 7 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सदर कारवाई जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सल्लागार डॉ.नम्रता सलुजा, मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक राहुल बुचुंडे, सामाजिक कार्यकर्ता हर्षद ढोबळे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) जयंत वाणे, अन्न सुरक्षा अधिकारी राजेश यादव, किरण गेडाम, व कर्मचारी रमन बावने तसेच आर्वी पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक भानुदास पिदुरकर यांच्या नेतृत्वात पोलीस शिपाई वैभव कट्टोजवार, रामकिसन खाजदेकर यांनी कार्यवाही पार पाडली.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे मानवी शरीरावर अनेत प्रकारचे दुष्परिणाम होतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात, हृदयविकास, कॅन्सर सारखे आजार हे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनामुळे होत असतात. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामध्ये विविध रासायनिक घटकांचा समावेश असतो जो शरीराला हानिकारक ठरतो. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाणे हे लहान मुलांमध्ये वाढत आहे. त्यामुळे या व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे. यासाठी तंबाखू नियंत्रण कायदा 2003 नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे तसेच 29 मे 2021 च्या शासन निर्णयानुसार तंबाखू, सूपारी, पानमसाला, गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास व थुंकन्यास आणि धुम्रपान करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी कळविले आहे.
0000000